नंदुरबार | प्रतिनिधी
इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षक पदोन्नतीबाबत दोनदा प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र नंदुरबार जिल्ह्यात एकदाही पदोन्नतीबाबत प्रक्रिया करण्यात दिरंगाई का होत आहे? असा सवाल उपस्थित करत जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह जि.प.सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तसेच ज्यांना पदोन्नती मिळालेली नाही त्यांच्याकडून प्रशासनाबाबत अपप्रचार केला जात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितल्याने एकच खळबळ उडाली.
नंदुरबार येथे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा याहामोगी सभागृहात पार पडली. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालविकास सभापती संगिता गावित, शिक्षण सभापती गणेश पराडके, बांधकाम सभापती शंकर पाडवी, कृषी सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी पाणी पुरवठा समितीचा आढावा घेत असतांना इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षक पदोन्नतीबाबत दोनदा प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र नंदुरबार जिल्ह्यात एकदाही पदोन्नतीबाबत प्रक्रिया करण्यात दिरंगाई का होत आहे? असा सवाल उपस्थित करत जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
सहा महिन्या उलटूनही पदोन्नती का होत नाही? यामुळे शिक्षण विभागातच पाणी मुरत आहे का? अशी शंका देखील उपस्थित करण्यात आली. दरम्यान, वस्ती शाळा शिक्षकांचे चार वर्षापासूनच प्रश्न प्रलंबित आहे तो निकाली निघालेला नाही, पदोन्नत्या रखडल्या आहेत. तसेच ज्यांना पदोन्नती देण्यात आली आहे ती ही नियमानुसार नसल्याचा आरोप सभापती हेमलता शितोळे यांनी केला. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या नावावर बोगस प्रमाणपत्र देवून गैरफायदा घेणार्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ज्यांना पदोन्नती मिळालेली नाही त्यांच्याकडून प्रशासनाबाबत अपप्रचार केला जात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यासाठी शबरी घरकूल अंतर्गत यंदा ८ हजार वाढीव घरकुलांचे उद्दिष्ट आले आहे. तर पूर्वीचे ४ हजार घरकुले यामुळे आता एकूण १२ हजार १९४ घरकुलांचे सर्वाधिक उद्दिष्ट असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या सुचनेप्रमाणे ५५ हजार ५०० लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात आला असून येत्या काळामध्ये त्यांनाही घरकुलांसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. अंगणवाडी बांधकामासाठी ग्रामपंचायतींना पैसे देवूनही पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम करण्यात येत नसल्याचे जि.प.सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी याबाबत माहिती घेवून संबंधित ग्रामपंचायतींना तात्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कामे पूर्ण होवून देखील बीले अदा होत नसल्याने तात्काळ बीले अदा करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली. यावर डॉ.सुप्रिया गावित यांनी संबंधित कामांवर अधिकार्यांकडून भेटी देवून काम गुणवत्तापूर्ण असल्यास तात्काळ बीले अदा करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य समितीच्या आढाव्याप्रसंगी जिल्हा आरोग्यधिकार्यांनी दिलेल्या माहितीनूसार, सन २०१५ मध्ये ३७ हजार सिकलसेल रुग्ण होते. तर त्यानंतर सद्यस्थितीत ३ हजार ५०० बाधीत झाले असल्याची माहिती दिली. सिकलसेल रोखण्यासाठी व उपचारासाठी यंत्र खरेदीचंा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १३७ ग्रामपंचायतींसाठी स्वत:च्या इमारती नाहीत. त्यापैकी ५१ ग्रामपंचायतींसाठी प्रस्ताव पालकमंत्र्यांनी पाठविले असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली. तसेच उर्वरित ग्रामपंचायतींसाठी देखील लवकरच स्वत:च्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेबाबत माहिती देतांना संबंधित विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुर्यवंशी म्हणाले, सद्यस्थितीत ग्रामरोजगार सेवकांचा संप सुरु आहे. यामुळे मजूरांची उपस्थिती कमी आहे. सध्या अवघे ९४८ मजूर कामावर उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्यांकडून ग्रामरोजगार सेवकांकडून ग्रामसेवकांच्या खोट्या सह्या केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकाराचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता नियमित नसल्याने पर्यायी औषधनिर्मात्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य देवमन पवार यांनी केली.
दरम्यान नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्य विजय पराडके यांनी शहादा तालुक्यातील एका ठेकेदाराकडून कार्यकारी अभियंत्यांनी ४५ हजार रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर श्री.पराडके यांनी व्यासपीठावर जात मोबाईलमधील संभाषण अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, सीईओ रघुनाथ गावडे यांना दाखवून कारवाईची मागणी केली. यावेळी श्री.पराडके म्हणाले, प्रत्येक काम करतांना टक्केवारी घेतली जाते. असे असतांना अतिरीक्त पैशांची मागणी संबंधित अधिकार्यांकडून केली जाणे लाजीरवाणी बाब आहे. यामुळे संबंधित अभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांची नुकतीच आदिवासी सहकारी साखर कारखाण्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्याच्या सत्काराचा ठराव ठेवण्यात आला होत.यावेळी भरत गावित व सभापती सौ.संगिता गावीत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.








