नंदुरबार :
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठी लेखक व प्रकाशकांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार निवडीअंती सन 2022 चे राज्य वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. पुरस्काराबाबत अधिक माहिती व प्रवेशिका अर्ज महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली उपलब्ध आहेत.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार, 2022 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख असावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी पुरस्कारासाठी 1 जानेवारी,2023 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत विहित नमून्यातील प्रवेशिका पूर्णत: भरुन पुस्तकांच्या दोन प्रतीसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. तर अन्य ठिकाणी राहणाऱ्या लेखक व प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत प्रवेशिका व पुस्तके पाठवावेत.असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








