नंदुरबार l प्रतिनिधी
कथित खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा भा. द. वी. कलम ३०२ प्रमाणे पोलीस स्टेशन धडगाव येथे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की, फिर्यादीची मुलगी ही एका सूतगिरणीत कार्यरत होती. ती भविष्य निर्वाह निधीची रक्कम घेण्यासाठी बाहेरगावी गेली होती. फिर्यादीची दुसरी मुलगी ही सतर्क संपर्कात होती. परंतु त्यानंतर संपर्क झाला नव्हता. फिर्यादीला वाटले की, मावशीच्या घरी धडगावला थांबली असेल. परंतु साक्षीदाराने फिर्यादीच्या पुतण्याला कळविले की, काही कागदपत्रे घटनास्थळावर मिळून आले आहेत. फिर्यादीच्या वडिलांनी शोध घेतला असता कागदपत्रांसोबत मुलगी मयत अवस्थेत आढळली.
फिर्यादीने सदर फिर्याद अज्ञात व्यक्तीच्या नावाने नोंदविली होती. परंतु पुढील जबाबात आरोपीचे नाव घेण्यात आले होते. आरोपीची १२ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणात आरोप पत्रही दाखल करण्यात आले होते.संशयित आरोपीने सत्र न्यायालय शहादा, जामीन मंजूर करण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालय शहादा, यांनी सदर अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध अर्जदार मनोज वळवी, रा. अक्कलकुवा, यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात जामीन न देण्यासाठी हस्तक्षेप अर्जही दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. जी. मेहरे) यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये जामीन मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. अर्जदारतर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन यांनी काम पाहिले.