नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रीया सुरू असून धडगाव तालुक्यातील २५,नवापूर ८१,तळोदा ५५ तर अक्कलकुवा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.दरम्यान,काल दि.२७ सप्टेंबर रोजी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांसह समर्थकांनी नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी केल्याने तहसिल कार्यालय परिसरांना यात्रेचे स्वरुप आले होते.एकूण २०६ सरपंचांसाठी १३२१ इच्छुकांनी नामांकने दाखल केली आहेत तर १ हजार ८४४ सदस्यांच्या जागांसाठी पाच हजार २७५ नामांकने दाखल झाली आहेत. दरम्या, आज छाननी करण्यात येणार असून दि.३० सप्टेंबर माघारीची अंतिम मुदत आहे.
धडगाव येथे २५ ग्रामपंचायत सरंपचांसाठी १७१ नामांकने
धडगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रीया पार पडत आहे.यात २५ सरपंचांसाठी एकूण १७१ नामांकने दाखल करण्यात आली आहेत तर २२३ सदस्यांसाठी ५८४ नामांकने दाखल झाली आहेत. यामध्ये नंदलवड, बोरवण, चोंदवाडे बु, खरवड,सुरवाणी, असली, अस्तंबा, पाडामुंड, खांडबारा,खुंटामोडी, कात्री, राडीकलम,पालखा, मनखेडी बु, चुलवड, खडक्या, सोन बु, गोरांबा, मोडलगांव, वेलखेडी, तलाई, मोख खु,मोख बु, भुजगाव व छापरी या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली.

नवापूर तालुक्यात ८१ सरपंचांसाठी ५४४ नामांकने
नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १४८ नामनिर्देशन दाखल करण्यात आले तर सदस्य पदासाठी ५१२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी ५४४ नामनिर्देशन दाखल करण्यात आले तर सदस्य पदासाठी २०६५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१ सरपंच पदासाठी ५४४ इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल झालेत. एकुण २५९ प्रभागांकरिता ७०९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी २०६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात माघारी व छाननीनंतर चित्र स्पष्ट होईल. बुधवारी २८ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.दि.३० रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवस आहे. निवडणूकीदरम्यान निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेवून सूचना देण्यात आल्याची माहिती तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
तळोद्यात ग्रामपंचायत सरपंचासाठी २८२ इच्छुक
तळोदा तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामांकन दाखलच्या शेवटच्या दिवशी ४६३ सदस्यांसाठी ५२६ जणांनी अर्ज दाखल केले तर सरपंच पदाच्या ५५ जागांसाठी ११० अर्ज दाखल झाले आहेत. सदस्य व सरपंच असे दोघे मिळून ६३७ जणांनी अर्ज दाखल केले. ग्रामपंचायत निवडणूक नामांकन दाखल प्रक्रिया तळोदा येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात घेण्यात येत आहे. इच्छुकांसोबत सर्मथकांनी काल गर्दी केल्याने त्यामुळे या मंगल कार्यालयासमोर यात्रेचे स्वरूपच आले होते. ग्रामपंचायत ५५ सरपंच जागेसाठी एकूण २८२ नामांकन दाखल झाले तर ४६३ सदस्यांसाठी १२०८ नामांकन दाखल झाले आहेत. तहसिलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूककामी नायब तहसिलदार शैलेश गवते, श्री.ससे आदी काम पाहत आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात ४५ सरपंचांसाठी ३२४ नामांकने
अक्कलकुवा तालुक्यातील नुकतीच ४५ ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात दि.२१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. काल अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी ११२ व सदस्य पदासाठी ४९८ अर्ज प्राप्त झाले.अद्यापपावेतो सरपंच पदासाठी ३२४ व सदस्य पदासाठी १३९८ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अक्कलकुवा तहसिलदार सचिन मस्के यांनी दिली.अक्कलकुवा तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून १५७ प्रभागात ४४९ सदस्य संख्या आहे. सोमवार २६ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकांनी अर्ज भरले तर मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे एकच गर्दी झाली होती.यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उशिरापर्यंत कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून परिश्रम घेतांना दिसत होते.









