खापर l प्रतिनिधी

शेतात पेरलेले मुगाचे बियाणे खराब निघाले, शेतातील उभं पिक हे पिवळे पडुन पूर्णपणे खराब झाले. बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदर बाब लक्षात आणुन दिल्या नंतर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे काना डोळा केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने द्यावी अशी मागणी दिलवरसिंग वळवी यांनी तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दिलवरसिंग लालसिंग वळवी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे 6 एकर क्षेत्रात पेरणी करण्यासाठी नंदुरबार येथील वर्धमान सिडस 42 यांचे कडुन दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रीन ग्राम अजित कंपनीचे 50 किलो मुग बियाणे खरेदी केले होते, सदर बियाणे शेतात लावण्यानंतर उगवले परंतु पिवळे पडून खराब होऊन गेले त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले आहे.असे म्हटले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबधीत दुकानदार दिलीप आचलचंद व कंपनीचे एजंट विजय ठाकुर,व बाविस्कर यांना वारंवार सुचना दिली त्यानुसार ते पाहणी करण्यासाठी देखील आले मात्र अद्याप पर्यंत काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. बोगस बियाणे देऊन माझी फसवणूक करणारे दुकानदार व कंपनी एजंट यांचेवर कायदेशीर कारवाई करावी व संबधीत कंपनीकडून माझे झालेली नुकसान भरपाई मिळवू दयावी अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार सचिन म्हस्के यांना निवेदन देतांना पंचायत समितीचे उपसभापती विजय पाडवी, माजी उपसरपंच जगदीश वसावे, जगदीश पवार, यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.









