नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनीसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “नंदिनी महोत्सव” हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार गोवाल पाडवी यांनी केले.
नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर लगतच्या डोममध्ये आजपासून “नंदिनी महोत्सव 2026” ला प्रारंभ झाला. खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव 25 फेब्रुवारी ते 01 मार्च या कालावधीत पाच दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 80 बचत गटांच्या महिलांनी उत्पादित वस्तूंचे स्टॉल तसेच 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, बांधकाम अभियंता शैलेश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी हरिभाऊ हाके, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक ईश्वर पवार, गटविकास अधिकारी संजय पाटील (नंदुरबार), महेश पोद्दार (शहादा), यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*उमेद मॉलद्वारे बचत गटांना नवीन ओळख*
केंद्र व राज्य शासन उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांना नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करीत असून जिल्हानिहाय सुमारे 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिली. उमेद मॉलसाठी योग्य शासकीय जागेवर सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत तसेच केंद्र शासनाकडून बचत गटांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार ॲड. पाडवी यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बचत गट चळवळीच्या माध्यमातून आदिवासी बहुल व दुर्गम नंदुरबार जिल्ह्याचे सकारात्मक चित्र राज्यात उभे करत असून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*उमेद अभियानाची जिल्ह्यात व्यापक पोहोच*
नंदुरबार जिल्ह्यात उमेद अभियान आज चळवळ बनले असून पावणेतीन लाख कुटुंबांपैकी 1 लाख 90 हजार कुटुंबांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे. जिल्ह्यात 19 हजार 708 बचत गट कार्यरत असून 80 टक्के कुटुंबांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. गावांमध्ये 863 ग्रामसंघ व 55 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. बचत गटांना सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंत बँक लिंकेज देण्यात आले असून कर्ज परतफेडीचे प्रमाण 97 टक्के आहे. सुनंदा पाडवी यांच्या मोहाच्या लाडूंना पुणे येथील कंपनीकडून चार लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. खाकरा, मिरची, मध यांसारख्या उत्पादनांना ऑनलाईन माध्यमातून मागणी वाढत असून अनेक बचत गट दर्जेदार व भेसळमुक्त घरगुती उत्पादने तयार करत नवीन ओळख निर्माण करत आहेत.
*जिल्हा प्रशासनाचे नियोजन*
जिल्हा प्रशासनाने सर्व स्टेकहोल्डर्सना एकत्र आणून बचत गटांच्या गरजांनुसार नियोजन केल्यामुळे सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले. ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करून उत्पादन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. बचत गटांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी यासाठी “कॅफे कम मार्ट” उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मिलेट आधारित खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या गटांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग करण्यासाठी नव्या पद्धती राबविण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*लखपती दीदी उपक्रम*
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील महिलांनी उत्साहाने उभारलेल्या स्टॉलचे कौतुक केले. 1 लाख 10 हजार महिलांना “लखपती दीदी” बनविण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 1 लाखांचे लक्ष्य गाठले असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी सरस महोत्सवात 25 लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा 50 लाख रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्जेदार उत्पादने व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महिला बचत गटांना बॅकतर्फे मंजुर अर्थसहाय्याचे धनादेश, आदेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.








