नंदुरबार l प्रतिनिधी-
खाकी वर्दीची ओढ आजही तरुणांच्या मनात तितक्याच जोमात आहे. अनेक तरुण पोलीस खात्यात भरती होऊन भविष्यात स्थैर्य आणि सेवा करण्याची इच्छा बाळगतात. मात्र, प्रत्यक्ष भरतीदरम्यान शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षेतील तांत्रिक चुका आणि दडपणामुळे अनेकदा उमेदवारांना अपयशाला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने आधुनिक आरएफआयडी चीफ तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्ह्यात प्रथमच पोलीस भरतीपूर्व सराव चाचणीचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला नंदुरबारसह आसपासच्या नंदुरबारसह खानदेशात तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी पहाटेपासूनच जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हजेरी लावून सराव चाचणीमध्ये सहभाग नोंदविला. मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येक उमेदवाराला जणू प्रत्यक्ष पोलीस भरतीची चाचणीच सुरू असल्याचा अनुभव मिळत होता.
जिल्ह्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचा वापर
चाचणीमध्ये एस.एफ. स्पोर्ट टाइमिंग अँड सर्व्हिसेस नाशिक यांच्या अत्याधुनिक जर्मन ‘रेस रिझल्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या प्रणालीमुळे धावण्याच्या वेळेत होणाऱ्या क्षुल्लक तांत्रिक चुका टाळल्या गेल्या तसेच प्रत्येक उमेदवाराच्या परफॉर्मन्सची अचूक नोंदणी शक्य झाली. तसेच उमेदवारांसाठी स्वतंत्र ट्रॅक, मैदानाची उत्तम आखणी, भरती चाचणीसाठी मैदानावर खास तयारी करण्यात आली होती. धावण्यासाठी स्वतंत्र १६०० मीटर, १०० मीटर रेस ट्रॅक, मुलींसाठी ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची सुविधा, गोळाफेक स्पर्धेसाठी स्वतंत्र मैदान, विविध चाचण्यांसाठी सुयोग्य मार्किंग, व्यवस्थापन आणि सुरक्षा, प्रत्यक्ष भरतीची अनुभूती मिळावी, चुका आधीच समजाव्यात आणि आत्मविश्वास वाढावा यावर विशेष भर देण्यात आला.
शारीरिक चाचणीप्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणपत गावित, विद्याश्रम अकॅडमी शहादाचे संचालक दिनेश पावरा, लेखी परीक्षेच्या उद्घाटनावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद भामरे, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, लिपिक मुकेश बारी, ड्रीम शिरपूर अकॅडमी चे सुभाष पावरा,भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते.
भीती कमी झाली, वेळेची अचूकता मिळाली!
या उपक्रमामुळे पोलीस भरतीतील सर्वांत महत्त्वाच्या ‘टायमिंग’ संबंधित चुका आणि दडपण मोठ्या प्रमाणात कमी झाली. प्रत्यक्ष सरावामुळे मूळ भरतीच्या दिवशी भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल.
-महेश पाटील(विद्यार्थी)
युवराज भामरे यांचा पुढाकार
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे यांनी केले. जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अशी सराव चाचणी प्रथमच घेण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांत मोठा उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यातील पोलीस भरती उमेदवारांना प्रत्यक्ष चाचणीपूर्वी योग्य प्रशिक्षण, अचूक वेळ नोंदणी, तांत्रिक जाण आणि आत्मविश्वासाचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात अशी चाचणी नियमितपणे घेण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याचे श्री.भामरे यांनी सांगितले.








