नंदुरबार l प्रतिनिधी
युतीधर्म निभवायला सोबत येण्याच्या गप्पा मारायच्या आणि धक्का देण्याचे कारस्थानही रचायचे, असे दुटप्पी मित्र मला राजकारणात आल्यापासून लाभले आहेत. ज्यांची नगरसेवक म्हणून निवडून येण्याची पात्रता नव्हती त्यांना आम्ही नगराध्यक्ष केले. ज्यांची ताकद झेडपी गटाच्या पलीकडे नव्हती त्यांना जिल्हास्तरावर नावाजून दिलं,
ते लोक आमच्या विरोधात सभा घेतात. परंतु जनतेला हे सगळे माहीत असल्यामुळे आज जनता आमच्या पाठीशी असून त्यांच्या विरोधाला कोणताही जनाधार उरलेला नाही; या शब्दात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
नंदुरबार तालुक्यातील पथराईसह दहा-बारा गावांमधील ग्रामस्थांशी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष संपर्क केला. तसेच काही गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे, बैठका घेणे, स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी भर दिला.
या दरम्यान झालेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी काँग्रेस कडून होत असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही त्यांना साधे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही.
मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली, लहान गावात सुद्धा काँक्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली. मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण, संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.