नंदुरबार l प्रतिनिधी
राजपूत समाज हा मूलतः शौर्यचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. मध्ययुगीन काळात युद्धभूमीवर राजपूतांनी राष्ट्र अभिमानासाठी पराक्रम गाजविला, आता राजपूत समाजभूमीत वेगवेगळ्या विधायक कार्यातून पराक्रम गाजवीत आहेत. जगभरात विविध क्षेत्रात राजपूत युवा-युवतींनी परिश्रम, प्रामाणिकता आणि बौद्धिक कौशल्यातून स्वतःचा ठसा उमटविला आहे. देशाच्या विकासात राजपूत युवा-युवतींचे कार्य प्रेरणादायी तथा प्रशंसनीय राहिलेले आहे असे मत राजस्थानच्या उपमुख्यमंत्री नामदार दिया कुमारी यांनी व्यक्त केले.
चित्तोडगड येथील जोहर स्मृती संस्थान आयोजित जोहर मेळाव्यात राजपूत समाजातील विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या युवा-युवतींना महाराणी पद्मिनी राष्ट्रीय पुरस्कार समारंभात राजस्थानच्या उपमुख्यमंत्री नामदार दिया कुमारी बोलत होत्या. समारोहचे अध्यक्षस्थानी जोहर स्मृती संस्थांनचे अध्यक्ष रावसाहेब नरेंद्रसिंह विजयपूर उपस्थित होते. धर्मगुरू म्हणून श्री श्री 1008 महामंडलेश्वर बालब्रह्मचारी अवदेसानंद गिरीजी सुरज कुंड कुंभलगड यांचेसह चितोडचे खासदार तथा राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी , चितोड विधानसभेचे आमदार चंद्रभान सिंह आख्या, निम्बाहेडा विधानसभेचे आमदार श्रीचंद कृपालनी, माजी राज्यमंत्री उदयलाल अंजना, राजेंद्र सिंग नरुका अलवर यांच्यासह राजस्थानातील विविध संस्थानचे तथा राजघराण्याचे महाराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जोहर मेळाव्यात राजस्थानसह देशभरातील तथा जगातील विविध प्रांतातील राजपूत समाज धुरीनींनी उपस्थिती दिली होती सुमारे दोन लाख समाज बांधवांच्या उपस्थितीत जितेंद्रसिंग राजपूत यांना महाराणी पद्मिनी राष्ट्रीय पुरस्काराने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री नामदार दिया कुमार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सन 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगडावर आक्रमण केले होते. सहा महिने प्रचंड निकराने झुंज देत राजपूत वीरांनी गड लढविला. महाराणी पद्मिनी बाईसा यांचे बंधू गोरा आणि बादल यांनी प्रचंड पराक्रम गाजविला. अखेर केसरीयाची वेळ आल्यावर महाराणी पद्मिनी व त्यांच्याबरोबरच्या 16 हजार राजपूत रमणींनी भडकलेल्या अग्निकुंडात राजपूती आन-बान शान व क्षत्राणी धर्म पालनार्थ आत्मसमर्पण करून बलिदान दिले. यानंतर महाराणी करणावती व महाराणी फुल कुवर आदी राणींनी हजारो राजपूत रमणी सह बलिदान भेदीला आत्मसमर्पण करून देश स्वाभिमान तथा धर्म रक्षण केले.
या विंरांगणांना श्रद्धांजली अर्पण करण्या हेतू जोहर मेळाव्याचे आयोजन केले जाते, असे प्रास्ताविकातून संस्थांनचे अध्यक्ष नरेंद्र सिंह विजयपूर यांनी सांगितले. सर्व उपस्थित व पुरस्कारार्थींचे स्वागत संस्थांनचे महामंत्री तेजपाल सिंह यांनी केले. जोहर भूमीवर श्रद्धांजली यज्ञात समिधा अर्पण करण्याचा सन्मानही जितेंद्रसिंग राजपूत यांना मिळाला. यापूर्वीही जितेंद्रसिंग राजपूत यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान राजपूत समाजाचे नव्हे तर विश्वाचे आदरस्थान, गौरवशाली इतिहासाची साक्ष देणार्या वीरभूमी चितोडगढ येथे झालेल्या या सन्मानाचे समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.