नंदुरबार l प्रतिनिधी
अलीकडे सर्वाधिक अपघात दुचाकींचे होत आहेत. दुचाकी चार चाकी वाहनांच्या अपघातात चालकाला नव्हे तर सर्व कुटुंबाला परिणाम भोगावे लागतात. अपघातात केवळ जीव जात नाही तर अपंगत्व देखील येते. वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. असे आवाहन संसद महारत्न खा. डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केले. याप्रसंगी खासदार हिना गावित यांनी परदेशातील वाहतुकीचे अनुभव कथन केले.
नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2024 समारोप समारंभाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार हिना गावित होत्या. दि. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.. त्याचा समारोप आज कऱण्यात आला..वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय आणि आयटीआय विभागातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, वाहतूक नियम तोडू नका आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या विद्यार्थी दशेतून चांगलं करिअर घडवा.
महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पाटील यांनी सांगितले की, वर्तमान व भूतकाळ आपल्या हाती असताना रस्ता सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी आहे. वेळ मूल्यवान आहे परंतु जीवन अमूल्य आहे. असेही पाटील म्हणाले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी, यांनी मनोगत व्यक्त केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, आपल्या देशात वर्षाला दीड लाख रस्ते अपघातात मृत्यू होतात. त्यापैकी 50 टक्क्यापेक्षा अधिक मृत्यू दुचाकी वापरणाऱ्यांचे होतात.. यामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियान समारोप समारंभास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. देसले, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी तर आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.