नंदुरबार l प्रतिनिधी
मानवी देह नश्वर असून मृत्यूनंतर देहातील अवयवांचे गरजूंना उपयोग व्हावा यासाठीच अवयवदान चळवळ राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन 26 वर्ष झाली. मात्र अजूनही देहदान, अवयव दानासाठी धुळ्यासह पर जिल्ह्यात जावे लागते. म्हणून देहदान प्रक्रियेसाठी राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची एकमुखी मागणी नंदुरबार जिल्हा वासियांकडून होत आहे.
यासंदर्भात नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीचे समन्वयक महादू हिरणवाळे यांनी माहिती देताना सांगितले की, धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर सन 1998 ला नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून देहदान, नेत्रदान, अवयवदान यासाठी जनजागृती आणि प्रबोधन चळवळ उभी करण्यात आली. गेल्या 26 वर्षाच्या कालखंडात सुद्धा दात्यांच्या परिवारातून आतापर्यंत 137 नेत्रदान, चार देहदान, आणि दोन दात्यांचे किडनी दान झाले आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नाते वाईकांनी नेत्रदानची इच्छा व्यक्त केल्यास संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी जावे लागत होते.
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सहा तासाच्या आत त्यांचे नेत्रदान प्रक्रिया होणे आवश्यक असते. मात्र नंदुरबार ते संभाजी नगर अंतर जास्त असल्याने या प्रक्रियेसाठी अडचणी निर्माण होत असे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीने आरोग्य विभागाशी सातत्याने प्रयत्न करून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात प्रक्रियेसाठी प्रयत्न केले. येथे अनेक नेत्रदान करणे सोयीचे झाले. त्यानंतर पुन्हा दोंडाईचा येथील रोटरी आय हॉस्पिटल येथे सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ आणि अंतर कमी झाले. नेत्रदान, देहदान आणि अवयवदान प्रक्रिया सुलभ, सोपी व्हावी यासाठी नंदुरबार येथे नव्याने निर्मित झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी आहे.
नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समिती नेत्रदान प्रबोधन चळवळीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत यात अध्यक्ष म्हणून डॉ. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ. अर्जुन लालचंदाणी, समन्वयक महादू हिरणवाळे, श्रीराम दाऊतखाणे, कार्यरत आहेत.