नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा तर याच महामार्गावर जांबली फाट्याजवळ वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अशा दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील खुषगव्हाण येथील गौरव अरुण पाडवी हा त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच. ३९ डी २८१) घेऊन अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होता. यावेळी जांबली फाट्याजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवित असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजुला खोलगट चारीत वाहन उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात राहूल राजेंद्र पाडवी यांचा मृत्यू झाला.
तर आकाश मानसिंग पाडवी, प्रितम हिरालाल पाडवी व राजेश गोविंद पाडवी यांना दुखापत झाली. याबाबत पोना.रविंद्र नामदेव कोराळे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गौरव पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत अक्कलकुवा तालुक्यातील जुने वाण्याविहिर येथील कांतीलाल काथा वळवी (वय ३५) हे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होते. यावेळी एका वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून कांतीलाल वळवी यांना धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अशोक काथा वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.








