नंदुरबार | प्रतिनिधी-
आपल्या पाच आठवडयाच्या कार्यकाळात नंदुरबार शहरात ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणार्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना सिल लावण्यात आल्याने तब्बल २ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली करण्यात आली असून शहरातील रहदारीला अडथळा ठरणार्या विविध भागातील अतिक्रमण काढले. यामुळे शहरातील चौक मोकळे झाले अशी माहिती पालिकेचे परिविक्षाधिन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. दरम्यान, छत्रपती नाटय मंदिराशेजारील डोम पालिकेने ताब्यात घेतले आहे.
येथील पालिकेच्या इतिहासात प्रथमच आयएएस अधिकारी म्हणून पुलकित सिंह हे लाभले होते. त्यांची एक महिन्यासाठी नंदुरबारच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या एका महिन्यात त्यांनी दबंग कामगिरी करुन शहरात वर्षानुवर्षे करण्यात आलेले अतिक्रमण काढून जागा मोकळी केली तसेच अनेक वर्षापासून मालमत्ता कराची भरणा न करणार्या व्यावसायिकांच्या दुकानांना सिल करण्याची धडक कारवाई श्री.सिंह यांनी केली. मात्र, पुलकित सिंह यांचा कार्यकाळ संपला असून दि. १५ मे ते ९ जून या कालावधीत त्यांच्याकडे अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
त्या पार्श्वभुमीवर आज सायंकाळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. आपल्या पाच आठवडयाच्या कार्यकाळाची माहिती देतांना श्री. सिंह म्हणाले, आपण मुख्याधिकारीपदाचा कार्यभार सुरु केल्यापासून शहरातील रस्ते वाहतूकीसाठी मोकळे कसे होतील याचा अभ्यास केला. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच रहदारीला अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली.
सदर कारवाई करतांनाच लक्षात आले की पालिकेेने केलेल्या सुशोभिकरणामुळेच रस्ते अरुंद होत आहे. त्यामुळे सुशोभिकरणाची रुंदी कमी केली. धुळे चौफुली, नवापूर चौफुली, करण चौफुली या ठिकाणी असलेल्या सुशोभिकरणाचा व्यास कमी केला. त्यामुळे रस्ते वाहतूकीला मोकळे झाले.
श्री.सिंह म्हणाले, शहरातील मालमत्ता कराची वसुली ही अत्यल्प होती. सदर वसुली व्हावी यासाठी ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना आधी नोटीसा बजावून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले होेते. तरीही थकबाकी न भरणार्या गिरीविहार सोसायटीतील व्यापारी संकुलातील सुमारे ३० दुकाने सिल केली, याशिवाय इतर ठिकाणीही मालमत्ता सिल करण्याची कारवाई करण्यात आली. रक्कम भरत नाही तोपर्यंत दुकाने सिल राहतील, असा इशारा दिल्यामुळे एका महिन्यात तब्बल २ कोटी रुपयांची थकबाकी वसुल झाली.
श्री.सिंह म्हणाले, आज ५० लाखांपेक्षा जास्त मालमत्ता थकबाकी असलेल्या आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यापैकी तीन जणांनी थकबाकी भरली. मात्र, उर्वरित पाच मालमत्ता सिल करण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील २० ले आऊट धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. ज्यांनी ओपन स्पेसबाबत कार्यवाही केलेली नाही. नियमानुसार त्यांना एक महिन्याआधी नोटीसा द्याव्या लागतात, त्यांना नोटीसा देवून २० दिवस झाले आहेत, पुढील योग्य ती कारवाई माझ्यानंतर येणारा अधिकारी करेल, असेही ते म्हणाले.
शहरातील छत्रपती नाटय मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहणार्या संस्थेला आज पालिकेने नोटीस बजावली. सन २०१७ पासून या संस्थेशी करार झाला आहे. परंतू नाटय मंदिराशेजारील डोमचे बांधकाम २०१९ मध्ये करण्यात आले. त्यामुळे डोमचा या करारात समावेश नव्हता. त्यामुळे सदर डोम पालिकेने ताब्यात घेतला आहे, असेही श्री.सिंह म्हणाले.
याशिवाय शहरातील जेपीएन रुग्णालयाची इमारत बचत गटातील महिलांना दिली आहे, जेणेकरुन बचत गटातील महिला त्यात विविध प्रकारचे प्रशिक्षण, किंवा इतर काही कामे करु शकतील, असेही ते म्हणाले.