नंदुरबार l
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वर्ष 2022-23 मध्ये जिल्ह्यातील 3 हजार 128 शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असून या योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 724 पूर्णांक 45 हेक्टर क्षेत्रावर या योजनेत फळबाग लागवड करण्यात आली आहे. तसेच चालू वर्ष 2023-24 मध्ये 2 हजार 240 हेक्टरवर या योजनेत फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर हे पुढील वर्षाच्या नियोजनासंदर्भात बोलताना पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीतील फलनिष्पत्ती लक्षणीय अशी आहे. जिल्ह्यात वर्ष 2022-23 साठी 2 हजार 240 हेक्टरवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्यात येणार असून त्यात नंदुरबार तालुक्यात 480 हेक्टर, नवापूर तालुक्यात 480 हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात 360 हेक्टर, शहादा तालुक्यात 480 हेक्टर, तळोदा तालुक्यात 220 हेक्टर, अक्राणी तालुक्यात 220 हेक्टरचा समावेश आहे.
गेल्या 2022-23 या वर्षात नंदुरबार तालुक्यात 144 पूर्णांक 85 हेक्टरवर 445 शेतकऱ्यांनी, नवापूर तालुक्यात 237 पूर्णांक 02 हेक्टरवर 657 शेतकऱ्यांनी, अक्कलकुवा तालुक्यात 342 पूर्णांक 58 हेक्टरवर 527 शेतकऱ्यांनी, शहादा तालुक्यात 423 पूर्णांक 05 हेक्टरवर 473 शेतकऱ्यांनी, तळोदा तालुक्यात 160 पूर्णांक 90 हेक्टरवर 216 शेतकऱ्यांनी तर अक्राणी तालुक्यात 416 पूर्णांक 05 हेक्टरवर 810 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेवून लाभ घेतला असून एकूण 1 हजार 727 पूर्णांक 45 हेक्टरवर 3 हजार 128 शेतकऱ्यांनी जिल्ह्यात लाभ घेतला आहे, अशीही माहिती पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली आहे.
या योजनेचा सर्वाधिक लाभ अक्राणी तालुक्यातील 810 शेतकऱ्यांनी घेतला असून त्या खालोखाल नवापूर 657, अक्कलकुवा 527, शहादा 473, नंदुरबार 445, तळोदा 216 शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. चालू वर्षात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले आहे.