शहादा l प्रतिनिधी
समस्त गुजर नाभिक समाज पंच शहादा नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री. संत सेना समाज सेवा मंडळ शहादाच्या वतीने दि. १० फेब्रुवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा येथील शहादा तालुका खरेदी विक्री संघ प्रांगणात शुक्रवार दि.१० फेब्रुवारी , रोजी सकाळी १०:३० वाजता समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ व श्री सतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा समाजाचा ८ वा व श्री. संत सेना समाज सेवा मंडळाचा वतीने द्वितीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. केवळ नाममात्र एकवीस रुपयात वर – वधुंची नाव नोंदणी केली जात असून आतापर्यंत २२ उपवर – वधू म्हणजे ११ जोडप्यांची नोंदणी झाली आहे. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता हळद, सार्थक ,पुजाविधी , भोजन, रात्री रासगरबा व दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नवरदेवांची शोभायात्रा मिरवणूक अंबाजी माता मंदिर खेतिया रोड पासून खरेदी विक्री संकुल पर्यंत निघणार आहे. सकाळी १०:३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यात वर – वधु पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, धार्मिक विधीसाठी स्वतंत्र पुरोहित, फोटोग्राफर व्हिडिओ चित्रीकरण विविध संसार उपयोगी साहित्य वितरण विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण , वाजंत्री समाज प्रथे प्रमाणे हळद, नवग्रह शांती यज्ञ , पेहरावणी , पाणेतर , सत्यनारायण कथा , विदाई आदी सर्व विधी भोजनावळ, स्वतंत्र मंडप, विवाह पत्रिका ,वर- वधू व पालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, फिरते शौचालय, मंडपात सी. सी. टि. व्ही. कॅमेरा , ड्रोन कॅमेरा , वॉकी टॉकी , डॉक्टर , प्रथमोपचार कक्ष , रुग्णवाहिका , अग्निशामक बंबाची गाडी , मोठा एल. ई. डी. टि. व्ही. संच , विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवर सरळ प्रक्षेपण आदी सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून १०,००० रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बेटा बेटी एकसमान , बेटी बचाओ बेटी पढाओ, अन्न , पाणी वाचवा असा संदेश देणारी जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत.
हळद समारंभ , बिदाई ते सत्यनारायण कथा असा दोन दिवस चालणारा हा परिसरातील एकमेव आगळा वेगळा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश आदी राज्यातील चार ते पाच हजार समाज बांधव व आप्तेष्ट उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसेच राजकीय, सामाजिक , आर्थिक , सहकार , विविध प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यातील भोजनावळीकरिता अनेक दानशूर दात्यांनी अन्नदानासाठी मदत करीत आहेत. याकामी समाजातील विविध संस्था, संघटना, तरुण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे , या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, समाज पंच मंडळ व विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेत आहेत.








