नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतची निवडणूक सुरू असून अर्ज छाननी झाली. दरम्यान नवापूर तालुक्यातील जामतलाव ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामस्थांच्या सर्वानुमते भरण्यात आलेले सर्व नामांकने छाननी अंती वैध ठरल्याने सरपंच पद व सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याने पारंपारिक ढोल वाजवून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे सरपंच पद व सर्व सदस्य कोणत्याही पक्षाचा व मोठ्या नेत्याचा आधार न घेता केवळ गावाचा विकास करण्याचा ध्यास ठेवून अपक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे जामतलाव ग्रामपंचायत सर्वांसाठी एक आदर्श ठरली आहे. नागरिकांनी जामतलाव ग्रामस्थांकडून धडा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
जामतालाव ग्रामपंचायत मध्ये तीन प्रभागांसाठी नऊ सदस्य संख्या होती. त्यानुसार एक सरपंच पद व नऊ सदस्य पदासाठी नामांकने दाखल करण्यात आली होती. छाननीअंती सर्व सदस्य पद व सरपंच पद वैध ठरल्याने बिनविरोध निवड झाल्याने जामतलाव ग्रामस्थांनी एकच जल्लोष साजरा केला.
जामतलाव ग्रामपंचायत साठी सरपंच पदावर बिनविरोध गावित सुमन सुरेश निवडून आल्या आहेत. तर सदस्य पदासाठी गावित दाण्या काकड्या, गावित मनेश मालजी, गावित दीपिका शिवाजी, गावित सुरेश गोविंद, गावित सुनीता गोविंद, गावित इंदिरा गोविंद, कोकणी बन्सीलाल गणपत, गावित रशीला रविदास, गावित कल्पना आलू हे सर्व सदस्य बिनविरोध आणि विशेष म्हणजे अपक्ष निवडून आले आहे.









