नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित मुलीवर अत्याचार होवून खून झाल्यानंतर तिच्या न्यायासाठी वडीलांनी तिचा मृतदेह ४४ दिवस खड्डयात मिठामध्ये पुरून ठेवला. ही घटना मनाला चटला देणारी असून राज्य सरकारचे मात्र या संवेदनशील विषयाकडे लक्ष नसून गेल्या एक महिन्यापासून आमचा बंड कसा योग्य हे सांगण्यातच मशगुल आहे.

पिडीतेच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी पार्टी पिडीतेच्या कुटूंबियांसोबत असून गरज भासल्यास आंदोलनही करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्यप्रवक्ते महेश तपासे यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत दिला.
जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील खडक्या येथील घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्यप्रवक्ते महेश तपासे हे जिल्हा दौर्यावर आले असता नंदुरबार येथील पालिकेच्या अटलबिहार वाजपेयी सभागृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना श्री.तपासे म्हणाले की, धडगांव तालुक्यातील खडके येथील मुलीवर अत्याचार होवून खून झाल्यानंतर न्यायासाठी वडीलांनी आपला मुलीचा मृतदेह तब्बल ४४ दिवस खड्यात मिठामध्ये पुरून ठेवला.
ही घटना खरोखरच वेदनादायी असून मनाला हेलावून टाकणारी आहे. आदिवासी विकासमंत्र्याच्या जिल्ह्यात अशी घटना घडणे हे दुखदायक आहे. ही घटना महिनाभरानंतर उघडकीस आली. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी प्रशासनाने तत्पुरता दाखविली नाही. सध्याचे सरकार संवेदनहिन असून मागील एक महिनापासून माझा बंड योग्य कशा होता. ते सांगण्यातच मशगुल आहे.
धडगांव तालुक्यातील खडक्या येथील घटनेनंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांनी याबाबत तत्परता दाखविली नाही. दिड महिन्यापासून आरोप प्रत्यारोपाचे सरकार चालू आहे. त्यामुळे पिडीतेच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे आज पोलीस अधिक्षकांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. तसेच मुंबई येथे पोलीस महासंचालक यांची भेट घेवून याप्रकरणातील दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणार आहोत.
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार पिडीतेला न्याय देत नाही. त्यामुळे मुलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आंदोलन देखील करेल. असे सांगत याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी श्री.तपासे यांनी केली. दरम्यान यावेळी एका प्रश्नाला उत्तर देतांना श्री.तपासे म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक पातळीवर देण्यात आले असून याबाबत स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील तोच राज्यपातळीवर मान्य करण्यात येईल. असे श्री.तपासे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्षा ऍड.अश्विनी जोशी आदी उपस्थित होते.








