नंदूरबार l प्रतिनिधी
कोविडच्या परिस्थितीनंतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जुलै २०२२ मध्ये एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या परंतु विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस ) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथील जवळपास १०० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत.
तसेच ( रूरल अँड ट्रायबल मूव्हमेंट इन इंडिया ) या विषयात पेपर दिलेला असून देखील जवळपास ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दाखविण्यात आलेले आहेत या विषयाची दखल घेत अभाविपने विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.
यासाठी कबचौउम विद्यापीठ जळगाव येथे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठाने लवकर लावावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश कार्यसमिती सदस्य निलेश हिरे, नंदुरबार जिल्हा सहसंयोजक योगेश अहिरे, अश्विनी गोसावी, भूषण घुगे, मयूर मराठे, दिपक पाडवी, हितेश साळी, अश्विन सुरवाडे आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.








