नंदुरबार l प्रतिनिधी
देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो नागरिकांना यातना झाल्यात, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार, दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने 14 ऑगस्ट 2022 हा दिवस ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.
‘विभाजन विभिषिका स्मृती दिनी’ 14 ऑगस्ट 1947 रोजीच्या घडामोडींबाबत वर्तमानपत्रातील कात्रणे, नियतकालिके उपलब्ध करुन घेऊन झालेल्या घडामोडी व ज्या लोकांचे त्यादिवशी बलिदान झाले आहे. त्या व्यक्तींविषयी अथवा समृहाविषयी माहिती प्रदर्शित करुन त्याचे प्रदर्शन महत्वाच्या ठिकाणी लावण्यात यावे. प्रदर्शनाचे आयोजन करतांना कोणत्याही समुदायाच्या, समाज घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी.
विभाजन विभिषिका स्मृती दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे. हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरूपात https://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm संकेतस्थळावर उपलब्ध आहे.








