नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील वन विभाग शहादा अंतर्गत नियातक्षेत्र आष्टा यातील मौजे सुतारे, हरिपूर, अजेपूर, अंबापूर येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या आदिवासी उपयोजनेतंर्गत क्षेत्र 20 हेक्टर रोपवनात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण, सरंपच, वनक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमती. खत्री यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या वन संरक्षणाच्या कामाचे कौतुक केले. तसेच वन महोत्सवानिमित्त त्यांच्या हस्ते ग्रामस्थांना शेवग्याची रोपे वाटप करण्यात आली. प्रारंभी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाच्यावतीने वृक्षदिंडी काढण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपाल युवराज भाबड, सुनंदा वेंडे , वनरक्षक सुनील करवंदकर, भूपेश तांबोळी, भानुदास वाघ, प्रतिभा पवार, विशाल शिरसाठ, लालसिंग पवार, दीपक विभांडीक, अरुण पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भाबड यांनी केले तसेच आभार प्रदर्शन धनंजय पवार यांनी मानले.