नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस दलाचे सोशल मिडियावर बारकाईने लक्ष असून दोन समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करणाऱ्यांवर तसेच संबंधित ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून बैठकीत देण्यात आली.
आगामी बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कार्यालयात शहरातील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील होते.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी, सचिन हिरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत पाटील यांच्यासह शांतता समितीचे १९ सदस्य उपस्थित होते. यावेळी शांतता समितीचे सदस्य गजेंद्र शिंपी, मौलाना जकेरिया, डॉ. जमील शेख, मोहन माळी, राजू इनामदार, मोहन खानवाणी, लियाकत बागवान, सुभाष पानपाटील, माणिक माळी, परवेज खान, मालती वळवी यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली.
यावेळी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी सदस्यांच्या शंकांचे निरसन करत माहिती दिली.सण-उत्सव काळात वीजपुरवठा खंडीत होवू नये, यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी गटारींच्या व स्वच्छतेसाठी पालिका मुख्याधिकारी यांना कळवण्यात आल्याची माहितीही पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. आभार पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे यांनी मानले.
पोलीस प्रशासन व शांतता समितीच्या सदस्यांनी नंदुरबार शहरात शांतता राखण्यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मिडियाचा जबाबदारी वापर करावा असे आवाहनही पोलीस दलाकडून करण्यात आले.