नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे जिजामाता शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे नुकतेच ‘मराठी विज्ञानसाहित्य : स्वरूप, व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई दिलीपराव मोरे उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत सौ.लक्ष्मी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या डॉ.मोना चिमोटे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पुणे विद्यापीठाचे डॉ.संजय ढोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे शिरपूर येथून डॉ.फुला बागुल, डॉ.रविंद्र शिंदे, पुणे विद्यापीठ तर प्रा.चिन्मय घैसास गोवा विद्यापीठातून उपस्थित होते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक सादर करतांना कार्यक्रमाचे समन्वयक तथा प्राचार्य डॉ.संजय शिंदे यांनी ” मराठी विज्ञान साहित्याची आजवरची वाटचाल, त्याचे स्वरूप, जागतिकीकरणानंतर विज्ञान साहित्य कुठे व कसे बदलत गेले, त्यातील जाणीवा अधिकाधिक मानवकेंद्री कशा होत गेल्या यावर प्रकाश टाकला. मराठी विज्ञानसाहित्य आज कोणत्या वळणावर आहे, त्याच्या विस्ताराची संभाव्य क्षेत्रे कोणती, मराठी साहित्याच्या प्रांगणात विज्ञानसाहित्य कुठे आहे या सर्व बाबींचा चिकित्सक उहापोह होणे हाच या चर्चासत्राचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी डॉ.संजय शिंदे यांच्याद्वारा लिखित ‘मार्गदर्शन आणि समुपदेशन’ आणि संपादित ग्रंथ ‘मराठी विज्ञानसाहित्य – स्वरूप, व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञानसाहित्याची निर्मिती हे देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी घटना असून समाजोपयोगी विज्ञानसाहित्याची निर्मिती नवीन संशोधकांनी केली पाहिजे. विज्ञानाचा वरदान म्हणून वापर केल्यास त्याचा फायदा राष्ट्रसमृद्धीसाठी नक्की होईल असे मत उद्घाटक डॉ.मोना चिमोटे यांनी व्यक्त केले. डॉ.संजय ढोले यांनी आपल्या बीजभाषणात भूतकाळातल्या विज्ञानसाहित्याचा मागोवा घेत भविष्यकालीन विज्ञानाची वाटचाल कशी असेल याविषयी रोचक घटना उपस्थितांसमोर मांडल्या. डॉ.चारुदत्त शिंदे यांनी वैद्यकीय आणि वाङ्मयीन साहित्याची उत्तम सांगड घातली. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी अधिकाधिक वैज्ञानिक साहित्याची गरज आहे. कथा, कादंबऱ्या यांच्याद्वारे सामान्यांपर्यंत विज्ञान पोहचण्यास मदत होते म्हणून साहित्य क्षेत्रात अधिकाधिक विज्ञानसाहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ.फुला बागुल यानी केले. गोवा विद्यापीठातून उपस्थित असलेले प्रा. चिन्मय घैसास यांनी विज्ञान आणि साहित्य यांचा समन्वयाने एका नवीन समाजोपयोगी ज्ञानामृताची निर्मिती होते असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शोभाताई मोरे यांनी महाविद्यालयाच्या वतीने एका अभिनव चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. विज्ञानसाहित्यावर झालेल्या चर्चेच्या मंथनातून उपस्थित संशोधकांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी भावना त्यांनी याप्रासंगी व्यक्त केली. चर्चासत्राचे समारोपीय अध्यक्ष जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजित मोरे यांनी विज्ञान हा असाधारण विषय असून सामान्य लोकांपर्यंत विज्ञान साहित्याच्या मदतीने तो अधिक गतीने पोहचेल म्हणून अशा कार्यक्रमातून साहित्यानिर्मितीची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन केले. याप्रासंगी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे वाचन केले. यात डॉ सुरेश मालचे नाशिक, डॉ. हर्षदा पुराणिक,संतोष पाटील, हर्षदा बोरगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन अशोक बागले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चर्चासत्राचे समन्वयक तथा प्राचार्य डॉ.संजय शिंदे, सहसमन्वयक डॉ.फुला बागुल,संयोजक डॉ.युवराज पाटील, प्राचार्य डॉ.रविंद्र पाटील, प्रा.संदीप भदाणे,गोविंद वाडीले, दर्पण भामरे, रवी पठाडे आदींनी परीश्रम घेतले.