नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ शाळेत श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी शाळेला अचानक भेट देऊन भौतिक सुविधा, शाळेतील उपक्रम, विद्यार्थ्यांकडून वाचन, लेखन क्रियांचा तपासणी केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत सूचना देण्यात आल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका छोटी पाटील, उपक्रमशील शिक्षक गोपाल गावित, हेमलता वळवी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भात लागवडीचा हा आनंद घेता यावा. रोजच्या जेवणात ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो अन त्यासाठी भात शेतकऱ्यांना किती काबाड कष्ट घ्यावे लागतात, हा धडा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना घेता यावा. यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोपाल गावीत यांनी अनोखी अशी शक्कल लढवली होती. भात लागवड करताना पाहणं आणि प्रत्यक्षात लागवड करणं यात जमीन-आस्मानचा फरक आहे.
हाच फरक प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी शालेय गणवेशातील विद्यार्थी थेट शेतात भात लागवडीचाअनुभव घेण्यासाठी शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पुस्तकातून लागवड अभ्यासली होतीच, मात्र प्रात्यक्षिकातून लागवडीचा हा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होतं. सध्या सगळीकडेच पुस्तकी ज्ञान दिलं जातं त्यामुळे मुलांना बाहेरच्या जगाची माहिती फार कमी प्रमाणात शाळकरी मुलांना दिली जाते. त्यात शेती किंवा पर्यावरणासारखे विषय हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊनच शिकले तर उत्तम कळतात त्यामुळे ही सगळी मुलं निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शाळेत उतरले आहेत.
प्रयोगशील शेतकरी निलेश गावीत यांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त करत पारंपरिक पद्धतीत प्रथम वाफ्यांमध्ये बियाणे पेरून रोपे तयार केली जातात आणि नंतर ती मुख्य शेतात लावली जातात. शेतात पाणी भरून रोपे लावली जातात, ज्यामुळे तण आणि कीटकांची वाढ कमी होते. या पद्धतीसाठी पाणी व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक असते. असेही सांगितले.
मुलांना अनेकदा काही गोष्टी पुस्तकात शिकून कळत नाही. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकता येतात त्या शिकवाव्यात मात्र ज्या गोष्टी प्रात्यक्षिक करुनच शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद खोल्यांच्या शाळेच्या बाहेर काढणं गरजेचं असतं. या बंद खोल्यांच्या बाहेरच्या शाळेत मुलांना वेगवेगळे धडे दिले पाहिजेत. शेतकरी, बळीराजा कसा राबतो, हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपल्या घरात भात कसा येतो, हेदेखील मुलांना कळलं पाहिजे, यासाठी मुलांना थेट शेतात भात लागवड म्हणजे काय हेच मुल्य रुजवण्यात प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याचं शिक्षक गोपाल गावीत सांगतात. रोज शाळेत जाऊन तोच तोच अभ्यास करुन विद्यार्थी कंटाळतात. विद्यार्थ्यांनाही काहीतरी नवीन हवंच असतं. त्याच जर विद्यार्थ्यांना निसर्गाचं शिक्षण दिलं तर विद्यार्थी देखील रमतात. अनेक गोष्टी अंगवळणी पाडून घेण्याचं हेच वय असतं. शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांना जगाशी लढण्याची ताकद देतं. त्यामुळेच त्यांची एक सहल म्हणून शेतात किंवा बाहेर फिरायला घेऊन जात असतो, असे देखील शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांची ही शक्कल पाहून काही विद्यार्थीही आनंदी झाले. तोच अभ्यास आणि तीच शाळा करुन विद्यार्थी कंटाळतात. त्यामुळे चिखलात उतरुन विद्यार्थ्यांनी भात लावणीचा मनमुराद आनंद घेतला आणि निसर्गाच्या शाळेत रमून गेले. श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी सांगितले की, पालक, विद्यार्थ्यांमध्ये सहयोगी शिक्षण, अनुभवजन्य शिक्षण आणि संकल्पनांची सखोल समज विकसित करणे हा असतो. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि कृतीतून शिकायला मिळते, ज्यामुळे ज्ञान अधिक काळ स्मरणात राहते. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा, विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज मिळण्यास मदत होते.
माता पालक, सहयोगी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळते. दैनंदिन जीवनाशी जोडणी आजूबाजूच्या परिसराशी आणि जीवनातील अनुभवांशी शिक्षण जोडले जाते.