नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. या भागातील वाडे, पाड्यावरील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.


धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ‘जल जीवन मिशन’च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री (नंदुरबार), जलज शर्मा (धुळे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (नंदुरबार), वान्मथी सी. (धुळे), धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. भुजबळ आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. ‘हर घर नल से जल’ नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापूर्वी राबविलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील साधनांचा वापर करून व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करून योजनांची सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे आवश्यक आहे. या माध्यमातून या कामांना तातडीने गती देत ती तातडीने पूर्ण करावीत. योजनांच्या पूर्ततेसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेवून तातडीने कार्यादेश देत पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील, अशी दक्षता घ्यावी. पुनर्जोडणीच्या कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार करावा. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यांतील दुर्गम, अतिदुर्गम भागातील कुटुंबांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. काही योजनांचा वाढीव खर्च होत असेल, तर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशाही सूचना मंत्री. श्री. पाटील यांनी दिल्या.
पाणीपुरवठा योजनांच्या कामांपूर्वी पाण्याची उपलब्धता असल्याची खात्री करून घ्यावी. पाणीपुरवठा योजनांची पूर्तता करतानाच सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी दिलेल्या लोकसंख्येच्या निकषांचे पालन करावे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गावाच्या ग्रामसभेचा ठराव घ्यावा. शाळा, अंगणवाड्यांना तातडीने नळ जोडण्या द्याव्यात. तसेच आवश्यक तेथे सौर ऊर्जेवर आधारित वीज पंप बसवावेत, असेही निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यात एकूण वैयक्तिक नळ जोडणीधारकांची संख्या तीन लाख 32 हजार 903 एवढी आहे. एकूण कुटुंबांपैकी 1 लाख 27 हजार 363 कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 2102 योजना प्रस्तावित आहेत. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील 11 योजनांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले, जलजीवन मिशनअंतर्गत कामांच्या पूर्ततेसाठी नियोजन करण्यात आले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्यात येतील. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बाविस्कर, यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते आमश्या पाडवी यांनी सहभाग घेतला.









